सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी अशा ३४ साखर कारखान्यांकडून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख ३८ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून जवळपास १ कोटी १९ लाख २७ हजार ६५३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. खाजगी २२ साखर कारखान्यांकडून ७८ लाख ५२ हजार ७१७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून त्या माध्यमातून तब्बल ६८ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. तर सहकारी १२ कारखान्याकडून ५९ लाख ५७ हजार ३७४ टनाचे गाळप करण्यात आले असून त्या माध्यमातून ५१ लाख ४८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. मात्र अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदा ऊस दरासाठी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बंहुताश कारखान्यानी ३ हजारांपेक्षा अधिक दर दिला आहे. सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाला ८.६४ टक्के, खाजगी कारखान्यांना ८.२३ तर सरासरीत ८.६९ टक्के रिकव्हरी अर्थात साखर उतारा मिळाला आहे. त्यामुळे यावरच शेतकऱ्यांच्या उसाचे बिल अदा होणार आहे.

















