शेतकऱ्यांनी ठोकले साखर कारखान्याला टाळे

डोईवाला : डोईवाला येथील शेतकऱ्यांनी राज्य शासन आणि साखर कारखान्याविरोधात आंदोलन केले. उसाचा दर निश्चित न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी डोईवाला साखर कारखान्याच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून निदर्शने केली. जर उसाचा दर लवकर निश्चित केला नाही तर आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संयुक्त संघर्ष शेतकरी समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी डोईवाला साखर कारखान्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून धरणे आंदोलन केले. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष दलजित सिंह यांनी सांगितले की, डोईवाला साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसात कपात केली आहे. एका दिवसात फक्त ५० ट्रॅक्टर – ट्रॉली आणि १८० ट्रॅक्टर बैलगाडी ऊस वजन करून स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे आहे. यामध्ये साखर कारखान्याने वाढ केली पाहिजे.

शेतकरी नेते राजेंद्र पुरोहित म्हणाले, भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. उसाचे गाळप सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, आजअखेर उसाचा दर निश्चित झालेला नाही. जिल्हा संयुक्त सचिव याकुब अली म्हणाले, शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळालेली नाहीत. पैसे हाती येत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. उसाचा दर ४५० रुपये क्विंटल करण्याची तसेच डोईवाला कारखान्याने स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. आंदोलनात मोहित उनियाल, शिवप्रसाद सेमवाल, जाहीद अंजुम, इंद्रजिंत सिंह, ताजेंद्र सिंह, बलबीर सिंह, शुभम कांबोज, हरभजन सिंह, गुरिंदर सिंह, परमजित सिंह, कमल, हरजीत सिंह, पुरुषोत्तम बडोनी, कमल अरोरा, सीमा रावत आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here