ढाका : रमजानच्या सणाच्या काळात अतिरिक्त साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी बांगलादेश सरकारने पावले उचलली आहेत. बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एम. डी. आरिफूर रहमान अपू यांनी सांगितले की, सध्या आमच्याकडे ४४,००० टन साखरेचा साठा आहे. वितरक आणि खुल्या विक्रीतून बाजाराला याचा पुरवठा केला जाईल.
उद्योग मंत्रालयाने रमजानच्या दरम्यान, उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे आणि बाजारातील साखरेचा दर स्थिर ठेवण्यासंबंधीत आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत अपू यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही प्रती किलो टीके ६४ दराने लूज साखरेचा पुरवठा करणार आहोत. तर टीके ६८ प्रति किलो दराने पॅकबंद साखरेची विक्री होईल. किरकोळ मार्केटमध्ये टीके ७५ पेक्षा अधिक दराने साखरेची विक्री होण्याची शक्यता नाही. बांगलादेशमध्ये दरवर्षी सरासरी १८ लाख टन साखरेची गरज आहे. त्यापैकी रमजानच्या कालावधीत तीन लाख टन साखर खपते.
उद्योग मंत्री नुरुल माजिद महमूद हुमायूं यांनी सांगितले की, रमजानच्या कालावधीत भेसळयुक्त खाद्यपदार्थ अथवा कमी गुणवत्तेच्या उत्पादनांना बाजारपेठेत प्रवेश रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार आहे. आमच्याकडे साखर आणि मिठाचा पुरेसा साठा आहे. जर कोणी कृत्रिम साठेबाजी करून दर वाढविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा हुमायूं यांनी दिला.