बिजनौर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने साखर कारखान्यांच्या सुरू होऊ घातलेल्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. कारखाने ऑक्टोबर महिन्यात गाळप सुरू करतील अशी शक्यता होती. मात्र, आता हंगाम आणखी काही दिवस पुढे ढकलला जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
सर्वकाही सुरळीत झाले असते तर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडून ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगामाला सुरुवात झाली असती. कारखान्यांमध्ये बॉयलर पूजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. परिणामी साखर कारखान्यांच्या ऊस खरेदी केंद्रात पाणी साठले आहे. कारखान्यांनी आपल्या ऊस खरेदी केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे दिले होते. त्यामुळे आता हा हंगाम आणखी काही दिवस पुढे जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बिलाई साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक जयवीर सिंह यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगाम प्रारंभासाठी २९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र, पावसामुळे हंगाम सुरू होण्याची तारीख काही दिवसांसाठी पुढे सरकेल. सीकरी, जहानाबाद, सलेमपूर, कल्याणपूर, मीरापूर आदी खरेदी केंद्रात पाणी साठले आहे. आणखी काही दिवस हे पाणी कमी होण्याची शक्यता नाही. दरम्यान, जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यांच्या गळीताचे सत्र ऑक्टोबरमध्ये सुरू होणार होते. पाऊस झाला नसता तर हंगाम वेळेवर सुरू झाला असता. आता काही दिवस यासाठी लागणार आहेत. कारखाने लवकर सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.