नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये दुहेरी अंकात तर पुढील आर्थिक वर्षात ६.५-७ टक्के यांदरम्यान राहील अशी अपेक्षा मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) के. व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सीईए सुब्रमण्यम यांनी सांगितले की, पुढील काळात चलनवाढीमुळे व्ही-आकाराचे पुनरुज्जीवन कमी होईल अशी अपेक्षा नाही. ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था यंदा, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये दुहेरी अंकात राहील. तर पुढील वर्षी तिच्या वाढीचा दर ६.५-७ टक्क्यांपर्यंत असेल. त्यानंतरच्या काळात हा दर ७ टक्क्यांवर राहील.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोलकाता यांच्याकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी सीईए आले होते. यापूर्वी आयएमएफ आणि इतर संस्थांनी भारताच्या वाढीचा दर ८.७ टक्क्यांपासून ९.४ टक्क्यांपर्यंत राहील असे अनुमान वर्तविले आहे.
सुब्रमण्यम यांनी सांगितले की, लोक अनेकदा महत्त्वपूर्ण सुधारणांच्या प्रभावांकडे लक्ष देत नाहीत. १९९१ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनाही ९९ टक्के लोक समजू शकले नव्हते. आम्ही वास्तवात खूप महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. त्याचा प्रभाव पुढील काळात पहायला मिळू शकेल असे त्यांनी स्पष्ट केले.