नवी दिल्ली : शेतकऱ्यांची सावकारांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आणि शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही चांगली योजना आहे. या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार आगामी बजेटमध्ये मोदी सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याची घोषणा करू शकते. एक फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण या आपला चौथा अर्थसंकल्प मांडतील. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार यात शेतीसाठी खूप घोषणा असू शकतात.
किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जास ७ टक्के असा व्याजदर आहे. मात्र, जर हे कर्ज एक वर्षाच्या आत फेडले तर शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के व्याज भरावे लागते. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी पिक विमाही करू शकतात. जर कोणत्याही घटनेत पिक नष्ट झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. पूर अथवा दुष्काळ अशा घटनेत शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरते. शेतकऱ्यांना हे कार्ड मोफत दिले जात आहे.