महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा जोरदार सुरू आहे. आणि या हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. महाराष्ट्र साखर उताऱ्याच्या बाबतीत चांगली कामगिरी करत आहे. राज्यात हळूहळू साखर उतारा वाढताना दिसून येत आहे. आता राज्याचा साखर उतारा १० टक्के झाला आहे.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये २६ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९६ सहकारी आणि ९८ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६८३.३४ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ६८३.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १० टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १६३.२१ लाख टन उसाचे गाळप करून १८६.०३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.४० टक्के आहे.