नजीबाबाद : किसान सहकारी साखर कारखाना नजीबाबादचे विस्तारीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. याबाबत शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. भाकियूचे प्रदेश उपाध्यक्ष बलराम सिंह आणि विभाग अध्यक्ष कुलवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी नजीबाबाद साखर कारखान्याच्या आवारात धरणे आंदोलन केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रदेश उपाध्यक्ष बलराम सिंह म्हणाले की, पाच वर्षापूर्वी नजीबाबाद दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण केलेले नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष, बिजनौरचे आमदार कारखान्याचे विस्तारीकरण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन देतात. मात्र, अद्याप त्याचीही पूर्तता झालेली नाही. कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो. त्यामुळे नाईलाजाने ऊस गुऱ्हाळांना कमी दराने विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जर मागणीकडे लवकर लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी मंडल उपाध्यक्ष प्रदीप परमार, तालुकाध्यक्ष सरदार इकबाल सिंह, सुनील कुमार, गजेंद्र सिंह, नवीन राजपूत, विजय सिंह, नीटू, गोल्डी, बंटी, बबलू, प्रशांत, महेंद्र, मुन्नू आदी उपस्थित होते















