सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासद, शेतकऱ्यांचे, तसेच तोडणी वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे हित जोपासले आहे. उसाचे उत्पादन वाढीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (आयए) तंत्रज्ञान प्राथमिक स्वरूपात ७० शेतकऱ्यांच्या शेतीवर वापरणार आहे. त्यामुळे खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर प्रतिवर्षीप्रमाणे आगामी गळीत हंगाम सन २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी कदम यांचे हस्ते ऊस तोडणी व वाहतूक करारास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मोहनराव कदम म्हणाले की, तोडणी, वाहतूक कंत्राटदारांनी आजपर्यंत कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच कारखान्याने आजपर्यंतचे सर्व हंगाम यशस्वी केले आहेत. ऊस तोडणी, वाहतूक करणाऱ्या सर्व कंत्राटदारांनी आपले करार आपल्या कारखान्यास करावेत. यावेळी शेती अधिकारी पी. के. सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर अनिल सुनील दणाणे (शिंगणापूर), राजाराम जाधव ( सावंतपूर), मारुती विष्णू पवार (बलवडी), दादासो विष्णू मोहिते (येतगाव ) आदी कंत्राटदारांना कदम यांच्या हस्ते करारपत्र घेऊन करारबद्ध करण्यात आले. कारखान्याचे संचालक बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, पोपटराव महिंद, दिलीपराव सूर्यवंशी, युवराज कदम, तानाजीराव शिंदे, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, संभाजी जगताप, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम आदी उपस्थित होते. उपशेती अधिकारी वैभव जाधव यांनी आभार मानले.