सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यामध्ये १,०४,४७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८,२८,७७६ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले. गाळप झालेल्या उसाचे दोन हजार ४९७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. मात्र, जिल्ह्यातील २७ साखर कारखान्यांकडे एप्रिलअखेर शेतकऱ्यांची तब्बल ४२५ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक कारखान्यांनी ऊस मिळविण्यासाठी हंगाम सुरू होताना २७०० ते ३५०० रुपयांपर्यंत ऊसदर जाहीर केला होता. मात्र बहुतांश कारखान्यांची प्रतिटन एफआरपी त्यांनी दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार किंवा जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी ऊस दर दिल्याचे दिसून आले आहे.
साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी शंभर टक्के ऊसबिले दिली आहेत. तर १९ कारखान्यांकडे २१५ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. मात्र, कारखान्यांनी जाहीर केलेला ऊसदर पाहिला तर २७ कारखान्यांकडे ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अद्यापही थकीत आहेत. केवळ सहा कारखान्यांनीच जाहीर केल्याप्रमाणे ऊसबिले दिली आहेत. थकीत ऊस बिलांसाठी शेतकरी कारखान्यांचे उंबरठे झिजवून वैतागले आहेत. यंदा राज्यात २० कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा समावेश आहे. मातोश्री, गोकूळ शुगर्स, लोकमंगल (बीबीदारफळ व भंडारकवठे), जयहिंद, संत दामाजी, सिद्धनाथ, इंद्रेश्वर, धाराशिव (सांगोला) या कारखान्यांवर मार्चमध्ये तर सहकार शिरोमणी, सिद्धेश्वर, आवताडे शुगर्स या कारखान्यांवर एप्रिलमध्ये आरआरसी झाली आहे. पण ही कारवाई निव्वळ फार्स ठरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केला आहे. एफआरपीपेक्षा जादा जाहीर केलेल्या ऊसदरासाठी शेतकन्यांमधून उठाव होणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.