उत्तर प्रदेशात ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्याची १ लाख क्विंटल साखर सील, ‘एडीएम’च्या कारवाईमुळे खळबळ

शाहजहांपूर: शेतकऱ्यांची १२६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत ठेवल्याबद्दल अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद कुमार यांनी मकसुदापूर साखर कारखान्याचे गोदाम सील केले. या गोदामात ४० कोटी रुपये किमतीची एक लाख क्विंटल साखर आहे. याबाबत ‘जागरण’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०२४-२५ च्या गळीत हंगामात साखर कारखान्याने २१ हजार शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. त्यासाठी एकूण १६९ कोटी ८३ लाख रुपयांचे ऊस बिल देणे अपेक्षित होते. परंतु २७ नोव्हेंबरपर्यंत कारखाना प्रशासनाने केवळ ४३ कोटी ५ लाख रुपये दिले आहेत. १२६ कोटी ७८ लाख रुपये अजूनही थकीत आहेत. बिलांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

२०२०-२१ या वर्षासाठी उसाच्या किमतीच्या विलंबाने देय असलेल्या व्याजाच्या रुपात १६ कोटी ७० लाख रुपयांचा आरसीदेखील कारखान्यावर जारी करण्यात आला. जिल्हा उपमहानिरीक्षक धर्मेंद्र प्रताप सिंह यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त जिल्हाधिकारी (वित्त) अरविंद कुमार, जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा, उप जिल्हाधिकारी पुवैयन चित्रा नरवाल यांच्यासह पथक साखर कारखान्यात पोहोचले आणि तेथील साखरेचा साठा, शिरा आणि कोजेनची तपासणी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उर्वरित देणी न दिल्यामुळे गोदाम सील करण्यात आले. साखर कारखान्याचा हंगाम ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झाला. तो यावर्षी ३० फेब्रुवारीपर्यंत चालला. याकाळात ४६.२० लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आला. दररोज सात हजार टन ऊस गाळप करण्याची क्षमता असलेल्या या कारखान्याला २५ हजार हेक्टर ऊसाचे वाटप करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here