सातारा : सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी सभासदांना मोफत घरपोच साखर देण्याचे आश्वासन दिले होते. विजयानंतर संचालक मंडळाला या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल करत सभासदांना मोफत घरपोच साखर द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी केली. यावेळी भरत चव्हाण, शिवाजी चव्हाण, बाबूराव पवार, उमेश मोहिते, संग्राम पवार, अमित जाधव, सिद्धेश थोरात, दिग्विजय थोरात आणि अन्य सभासद उपस्थित होते.
सह्याद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कारखान्याच्या २०२२-२३ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी इतर कारखान्यांप्रमाणे प्रतिकिलो २ रुपये दराने १० किलो साखर किंवा मोफत साखर देण्याची मागणी केली होती. मात्र, कारखान्याच्या अध्यक्षांनी कारखान्यावरील कर्जाचा हवाला देत ही मागणी फेटाळली. ७ किलो साखर १० रुपये प्रतिकिलो दराने देण्याचा निर्णय घेत सभासदांची निराशा केली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांना मोफत घरपोच साखर देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून सभासदांनी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला विजय मिळवून दिला. मात्र, विजयानंतर अध्यक्ष आणि संचालक मंडळाला या आश्वासनाचा विसर पडला आहे. निवडणूक जाहीरनाम्यात सभासदांना दरमहा ७ किलो मोफत घरपोच साखर देण्याचे आश्वासन दिले. मात्र, नवीन साखर नोंद कार्डानुसार प्रत्येक सभासदाला आता ३४ किलो साखर कमी मिळत आहे. दोन महिन्यांची साखर दिवाळीच्या नावाखाली कमी करून संदिग्धता निर्माण केली आहे. सभासदांची ही फसवणूक असल्याचा आरोप करत निवासराव थोरात यांनी समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.