अहिल्यानगर : कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी हालचाली गतिमान

अहिल्यानगर : गेल्या दोन वर्षांपासून कुकडी सहकारी साखर कारखाना बंद आहे. गेल्या काही वर्षांत कारखान्याला आर्थिक अडचणी, धोरणात्मक अपयश आणि राजकीय अनास्थेचा फटका बसला होता. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. कारखाना बंद असल्याने शेतकरी चिंता आणि निराशा होती. आता माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेल्या प्रवेशामुळे साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या आशा पल्लवित होत आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम पुन्हा सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. स्व. कुंडलिकराव जगताप यांच्या दूरदृष्टीतून आणि सभासदांच्या पाठबळावर उभ्या राहिलेला हा साखर कारखाना राहुल जगताप यांच्या सत्ताधारी पक्षात प्रवेश म्हणजे कारखान्यासाठी नवी दिशा आणि संधी असल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार जगताप यांनी कुकडीच्या पुनरारंभासाठी त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका शेतकरी व सभासदांमध्ये आश्वासक विश्वास निर्माण करणारी ठरत आहे. याबाबत, कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहनराव आढाव म्हणाले की, माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ‘केल्याने कारखान्याच्या प्रशासकीय व आर्थिक पातळीवरील अडथळे दूर होतील. सरकार दरबारी आवाज पोहोचेल आणि निधी मिळवण्यात मदत होईल. तर उक्कडगावचे शेतकरी बापूसाहेब कातोरे यांनी सांगितले की, गेल्या दोन हंगामांपासून आमचा हक्काचा कारखाना बंद असल्यामुळे अडचणीत होतो. आता कुकडी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारखाना पुन्हा कार्यरत झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या शक्यता अधिक बळकट झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here