नो टेन्शन – देशात यंदा साखर टंचाई भासणार नाही : राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाला विश्वास

कोल्हापूर : देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवरही पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा ४९ लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ या महिन्यांत देशाअंतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे. यंदाच्या हंगामात २६१ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर उत्पादन कमी असले तरी पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत देशात साखरेची टंचाई भासणार नाही, असा विश्वास साखर महासंघाने व्यक्त केला आहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी हा साठा पुरेसा होवू शकतो.

ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटक ही राज्ये देशात ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत. या राज्यांच्या उत्पादनावरच देशातील साखरेचे गणित अवलंबून असते. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे या राज्यात लागवडीत घट झाली. तसेच महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये हंगामाच्या प्रारंभीच मोठा पाऊस सलग इाल्याने पाणी साचून राहिल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घाटले. लागवडी कमी झाल्याने घट अपेक्षित असली तरी परतीच्या पावसाने सुमारे वीस टक्क्यांपर्यंत साखर उत्पादनात घट केली सध्या एक्स मिल साखरेच्या किमती ३,८८० से ३,९२० प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिर आहेत.

यंदा साखर उत्पादनाने निराशा केली असली तरी पुढील हंगाम मात्र साखर उत्पादन वाढीच्या दृष्टीने चांगला जाईल, असा अंदाज आहे. पुढील वर्षी तब्बल ३५० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होवू शकतो. ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा ऊस लागवडी वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम साखर उत्पादन वाढीवर होवू शकतो. साखर उद्योगाने २०२२-२३ या वर्षात ४३ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली आणि त्यातून ३६९ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. २०२३-२४ या वर्षांत साखरेच्या कच्च्या मालापासून करण्यात आलेल्या इथेनॉलचा पुरवठा २७० कोटी लिटर इतका झाला. ही घसरण २०२४-२५ या वषींही चालू राहीली. यंदा इथेनॉलचा पुरवठा २५० कोटी लिटर इतका होईल, असा अंदाज आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले कि,\ अनुकूल मॉन्सून परिस्थिती आणि महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या प्रमुख उत्पादक राज्यांत वाढलेल्या उसाच्या लागवडीनंतर अपेक्षा वाढल्या आहेत. त्या सोबतच यंदा केंद्र शासनाने उसाची वाढीव एफआरपी वर्षांच्या सुरुवातीलाच जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढलेला आहे. यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन वाढीची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here