इथेनॉल खरेदीच्या किमतींमध्ये सुधारणा करण्याची सरकारकडे मागणी : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

मुंबई : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यात ५८ लाख टनांची घट होऊन, चालू हंगामात ते २५७.४० लाख टनांपर्यंत खाली आले आहे. प्रामुख्याने उसाची उपलब्धता घटल्याने आणि सरासरी साखर उतारा घसरल्याने साखर उत्पादनात घट झाली आहे. १५ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण साखर उत्पादन सुमारे १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. उसाची कमी उपलब्धता आणि कमी साखर उताऱ्यामुळे साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे.

देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्राचे उत्पादन ११०.२० लाख टनांवरून ८०.९५ लाख टनांवर आले आहे. उत्तर प्रदेशचे उत्पादन १०३.६५ लाख टनांवरून ९२.७५ लाख टनांवर आले आहे. कर्नाटकात ५१.४० लाख टनांवरून ४०.४० लाख टनांवर आले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे की, साखरेचा उत्पादन खर्च ४० रुपये प्रति किलो असून, त्यामुळे किमान साखर विक्री दर किमान ४० रुपये करावा. २०२५-२६ च्या हंगामासाठी इथेनॉलसाठी ५० लाख टन साखर वळवण्याचे लक्ष्य जाहीर करावे. इथेनॉल खरेदीच्या किमतींमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. प्रामुख्याने उसाच्या रसापासून आणि बी – हेवी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ करावी, अशी मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here