कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. शाहूनगर, परिते येथील कारखान्याच्या मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, गेल्या हंगामात राज्यात ऊसटंचाई असूनही कारखान्याने ४.२५ लाख टन उसाचे गाळप केले. यंदा ऊस मुबलक प्रमाणात आहे. यावेळी राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्ष व संचालक हिंदुराव चौगले यांच्या हस्ते मिल रोलरचे विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष राजाराम कवडे, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, वर्क्स मॅनेजर जी. जी. लोकरे, डी. डी. किल्लेदार, कर्मचारी प्रतिनिधी धनाजी पोकर्णेकर, दत्तात्रय हायकर उपस्थित होते.