काबुल (अफगाणीस्तान) : अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर गंभीर पाण्याच्या संकटाकडे वाटचाल करत आहे, जर तातडीने उपाययोजना न केल्या तर २०३० पर्यंत जवळजवळ सात दशलक्ष रहिवाशांना प्यायलाही पाणी मिळणार नाही, असे खामा प्रेसने मर्सी कॉर्प्सच्या हवाल्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत जलद लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांमुळे शहराच्या भूजल पातळीत ३० मीटरने घट झाली आहे. परिणामी, काबुलच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. मर्सी कॉर्प्सचे अफगाणिस्तान संचालक डेन करी यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत म्हटले आहे की, पाण्याच्या अभावामुळे लोकांना स्थलांतर करावा लागू शकते.
अहवालात पुढे असे अधोरेखित केले आहे की, काबुलमधील पाणी उपसा नैसर्गिक पुनर्भरण दरापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. घटत्या साठ्यांव्यतिरिक्त, सांडपाणी, खारटपणा आणि आर्सेनिकमुळे होणारे दूषित पाणी यामुळे लोकांना चांगले पाणी मिळणे कठीण होणार आहे. २००१ पासून, काबूलची लोकसंख्या सात पटीने वाढली आहे, ज्यामुळे आधीच नाजूक असलेल्या पाण्याच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. खराब प्रशासन आणि गुंतवणुकीचा अभाव यामुळे संकटाचे व्यवस्थापन आणखी आव्हानात्मक बनले आहे.
जलसंपदा तज्ञ नजीबुल्लाह सदीद यांनी इशारा दिला की, काबूल एका अपरिवर्तनीय टप्प्यावर पोहोचत आहे. काबूल अशा संकटाचा सामना करत आहे जिथे त्वरित कारवाई न केल्यास परतीचा मार्ग नाही. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शाश्वत, दीर्घकालीन उपाय गरजेचे आहेत, असे ते म्हणाले. पुढील दशकात अफगाणिस्तानच्या राजधानीत विनाशकारी दुष्काळ होऊ शकतो, हे टाळण्यासाठी मर्सी कॉर्प्स तातडीने आंतरराष्ट्रीय मदत आणि मजबूत स्थानिक प्रशासनाचे आवाहन करत आहे.