पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये येत्या गळीत हंगाम २०२५-२६ साठी कार्यक्षेत्रात सुमारे आठ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा किमान चार लाख टन ऊस गाळपासाठी घेऊन सुमारे १२ लाख टन ऊस गाळप करण्याचे संचालक मंडळाने उद्दिष्ट ठरविले आहे. त्यादृष्टीने ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्याचे नियोजन सुरू केले आहे. जास्तीत जास्त ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांनी करार करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ गुरुवारी (दि. १२) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष जाचक म्हणाले की, कारखान्याच्यावतीने ॲडव्हान्स व बिगर ॲडव्हान्समधील एकूण ३५० ट्रॅक्टर, ९०० बैलगाडी, ६०० ट्रॅक्टर गाडीचे व दहा केन हार्वेस्टरचे करार करण्यात येणार आहेत. तोडणी वाहतूक यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ करण्यापूर्वी कारखान्याने मागील हंगामातील ऊसतोडणी वाहतुकीची बिले, कमिशन, डिपॉझिट इत्यादीचे पेमेंट संबंधित ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. ॲडव्हान्सच्या पहिल्या हप्त्याचे त्वरित वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला संचालक शिवाजी निंबाळकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, मंथन कांबळे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, कामगार नेते युवराज रणवरे, विजय पाटील यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.