पुणे : माळेगाव साखर कारखाना निवडणूक आम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर जिंकणार आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख पुर्वी सत्तेत होते आणि सध्या निळकंठेश्वर पॅनेलचे प्रमुख सत्तेत आहेत. या दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी शरद पवार यांच्याबरोबर काम केले आहे. परंतु, आता हे दोन्ही प्रमुख पवारसाहेबांपासून बाजूला गेले आहेत. त्यामुळे ‘माळेगाव’चे शेतकरी सभासद नाराज आहेत. सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि कारखान्याला प्रगतिपथावर नेणे, यासाठी आम्ही पवारसाहेबांच्या विचाराचे स्वतंत्र बळीराजा सहकार बचाव पॅनेल तयार केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिली.
माळेगाव कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पणदरे (ता. बारामती) येथे बळिराजा सहकार बचाव पॅनेलच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी युगेंद्र पवार बोलत होते. ते म्हणाले, “माळेगाव कारखान्यामध्ये उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सुरवातीच्या काळात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती धोरण स्वीकारली गेली. परिणामी आर्थिक व्यवस्थापनात माळेगाव पुढे आला. परंतु अलीकडच्या काळात सर्वच कारभाराला घरघर लागली आहे. येथील प्रशासनाला यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देता आली नाही. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर आंदोलने केली आणि येथील सभासदांचा ऊस दर प्रतिटन ३३३२ रुपयांपर्यंत पोचला. आंदोलनावेळी मात्र पारंपरिक विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आताचे आणि पूर्वीचे सत्ताधारी बाजूला सारण्याची वेळ आली आहे. बळिराजा पॅनेलचे उमेदवार सभासदांनी विजयी केल्यास सभासदांना उच्चांकी ऊस दर मिळेल व कारखान्याची विस्कटलेली घडी दुरुस्त होईल. कारभार अत्यंत पारदर्शक करण्यास आम्ही कटिबद्ध आहे.