कोल्हापूर : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी घेतली. यामध्ये कारखाना निहाय उसाच्या उत्पादनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा उसाच्या क्षेत्रात १३ हजार हेक्टरने वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार हेक्टर तर सांगली जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढल्याचे कारखानदारांनी सांगितले. त्यामुळे आगामी गळीत हंगामात सुमारे साखर कारखान्यांकडे ११ लाख टन ऊस गाळप वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गेल्या वर्षी उसाच्या वाढीच्या वेळीच सप्टेंबरमध्ये एकसारखा पाऊस राहिला. त्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने उसाची वाढ होऊ शकली नाही. परिणामी उसाचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने हंगाम लवकर गुंडाळावा लागला. ऊस मिळवताना साखर कारखान्यांची धावपळ उडाली होती. यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यातच यंदा उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपयांची झालेली वाढ झाली आहे. त्याचवेळी भुईमूग, सोयाबीनसह भाजीपाला पिकाला हमीभाव नसल्याने मातीमोल दराने विक्री करावी लागते. इतर पिकांच्या तुलनेत उसाला किमान हमीभाव तरी मिळतो. त्यामुळे लागवड वाढली आहे. याबाबत साखर अभ्यासक पी. जी. मेढे म्हणाले की, यंदा उसाचे क्षेत्रात वाढ झाली असली तरी आम काळात पाऊस कसा राहतो, त्यावर उसाचे उत्पादन राहणार आहे.