पुणे : ज्येष्ठ नेते चंद्रराव (अण्णा) तावरे यांनी गेल्या ४५ वर्षांत सहकारातून माळेगाव कारखान्याच्या शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी केली. त्यामुळे त्यांच्या कष्टाचे फळ सभासद नक्की देतील. खासगी कारखानदारांनी स्वतःला किताही सहकाराचे पुरस्कर्ते आम्ही आहोत, असे म्हणून घेतले तरीही सभासद त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे सभासद राजा जागा हो, सहकाराचा धागा हो,” असे आवाहन सहकार बचाव शतकरी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या प्रचारातील व्यूहरचना आम्ही हाणून पाडणार असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. मळद, निरावागज, मेखळी येथे सोमवारी (ता. १६) अजित पवार यांनी विरोधक चंद्रराव तावरे यांना टीकेचे लक्ष केले होते. तोच धागा पकडत रंजन तावरे यांनी मंगळवारी कुरणेवाडी, बारवनगर येथे पवार यांच्या आरोपांचे खंडण केले. ते म्हणाले, “माळेगाव कारखान्याचा सर्वांगीण विकास हा चंद्ररावअण्णांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. साखर कारखान्याचे विस्तारीकरण, डिस्टलरी प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, शिवतीर्थ मंगल कार्यालय, शिक्षण संस्था उभारण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
५० वर्षांत पवार कुटुंबीयांना बारामतीकरांनी लोकसभा, विधानसभा यासह सर्वकाही दिले. तरीही त्यांना शेतकऱ्यांचा माळेगाव कारखाना पाहिजे. हे सभासद कदापीही खपून घेणार नाहीत. त्याचा प्रत्यय या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांच्या बोलण्यातून येत आहे. मागील निवडणुकीमध्येच आम्ही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हरलो होतो, आता त्याची पूर्णतः खबरदारी घेतली आहे. माळेगावची निवडणूक ही पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. परंतु ही निवडणूक शेतकरी, सभासदांच्या प्रपंचाची आहे. मुला बाळांच्या भवितव्याची आहे. त्यासाठी सभासद बंधूनो आपल्याला या महासत्तेशी लढताना एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा माळेगाव कारखाना जर पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या हातात गेला, तर शेजारची पुन्हा ११ गावे जोडण्याचा घाट ही मंडळी घालतील. त्यामुळेच आम्ही सभासदांना सत्तापरिवर्तान करण्यासाठी सहकार बचाव पॅनेलच्या किटली या चिन्हावर मतदान करण्याची विनंती करीत आहे, असे तावरे यांनी सांगितले.