पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दि. २२ जूनला निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. अशातच शरद पवार यांच्या पॅनेलचे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी साखर कारखान्याची ही निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले. पवार म्हणाले की, या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे असे कसे म्हणता येईल? हा स्थानिक प्रश्न आहे. ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे. याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. आजूबाजूला जे तालुके आहेत, त्यांचे लक्ष इथे नाही. दरम्यान, नुकतेच महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करताना पवार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे हित साधले जाईल. महाराष्ट्र सरकारने ५०० कोटींचा निर्णय घेतला आहे. सरकारने ऊस आणि बाकीच्या पिकांसाठी हा निधी वापरण्याचे ठरवले ही चांगली बाब आहे.
माळेगाव कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम : अजित पवार
महाराष्ट्रातील दोनशे साखर कारखान्यापैकी प्रथम क्रमांकाचा ऊसदर देणारा एकमेव माळेगाव कारखाना आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही ऊस दराची भुरळ पडली आहे. त्यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात माळेगावच्या प्रशासनाचे अभिनंदनाचे ठराव केले. याचाच अर्थ कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिरवली (ता. बारामती) येथे निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. कारखान्याने गेल्यावर्षी प्रती टन ३,६३६ रुपये दर दिला. यंदा ३,३३२ रुपये अॅडव्हान दर सभासदांना दिला आहे. अंतिम दर अद्याप जाहीर व्हायचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अजित पवार म्हणाले की, विरोधकांचे वय ८५ च्या पुढे गेल्याने त्यांनी आता थांबून पुढच्या पिढीकडे कारभार देण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवावा. अर्थात हेच म्हणणे आता बहुतांशी सभासदांनी मान्य केले आहे. त्याचा प्रत्यय माळेगावच्या मतपेटीतून दिसेल. ज्या गावात जास्त मतदान त्या गावात स्वीकृत संचालक पद दिले जाईल. माळेगावच्या सभासदांना उच्चांकी ऊस दर देऊन या दराची स्पर्धा राज्यातील साखर कारखान्यांशी करणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ३७ गावांमधील रस्ते, दिवाबत्ती, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्य, शिक्षणासह मूलभूत गरज उपमुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण करणार आहे. राज्य सरकारने साखर उद्योगाला अधिक बळकटी देणे व शेतकऱ्यांच्या बांधावर एआय तंत्रज्ञान पोचविण्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे ७० टन एकरी ऊस घेणारे शेतकरी १०० टनापर्यंत, तर ८० टन ऊस घेणारे शेतकरी सव्वाशे टनापर्यंत उत्पन्न घेऊ शकणार आहेत. त्या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील इतर साखर कारखान्यांबरोबर माळेगावच्या सभासदांचा आर्थिक फायदा होणार आहे.