पुणे : छत्रपती कारखान्याचे कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर, परराज्यात जाणारा ऊस रोखण्यात यश

पुणे : निरगुडे (ता. इंदापूर) येथील शेतकरी इरफान इनामदार यांचा ८६०३२ या व्हरायटीचा ऊस गुऱ्हाळासाठी बाहेरील राज्यात जात असल्याची माहिती छत्रपती कारखान्याच्या शेतकी विभागाला मिळाली. याची दखल घेत कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांना ऊस छत्रपती कारखान्याला गाळपासाठी देण्याची विनंती केली. यानंतर स्वतः अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनीही शेतकरी इरफान इनामदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि ऊस कारखान्याला देण्याचे आवाहन केले. जाचक यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले आणि इनामदार यांनी उसाची तोड थांबवून उर्वरित ऊस कारखान्याला गाळपासाठी देण्याचे मान्य केले.

कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे छत्रपती कारखान्याला ऊस देऊन गतवैभव मिळवून देण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करीत आहेत. गाळपासाठीच्या त्यांच्या तळमळीला शेतकऱ्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चालू वर्षी छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १२ लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जाचक यांच्या प्रयत्नांमुळेच निरगुडे (ता. इंदापूर) येथील शेतकरी इरफान इनामदार यांनी बाहेरील राज्यात गुऱ्हाळासाठी निघालेला ऊस थांबवून तो कारखान्याला देण्याचा निर्णय घेतला. मुख्य शेतकरी जालिंदर शिंदे, कर्मचारी अक्षय निंबाळकर, बाळू गायकवाड, रमेश कन्हेकर, गणेश सपकळ, पोपट बागल, राहुल वाबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here