कोल्हापूर विभागात यंदा ऊस लागवडीत सुमारे १३ हजार हेक्टरची वाढ, उसाचे उत्पादनही वाढणार !

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा ऊस लागवडीत सुमारे १३ हजार हेक्टरची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात साखर कारखान्यांमध्ये सुमारे ११ लाख टन अधिकचे गाळप होऊ शकेल असा साखर उद्योगाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये कारखानानिहाय उसाच्या उत्पादनाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार हेक्टर तर सांगली जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढल्याचे कारखानदारांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले, करवीर व कागल या चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक ऊस उपलब्ध असेल. या तालुक्यांपैकी शिरोळमध्ये १६ लाख टन, हातकणंगलेमध्ये १५ लाख टन, करवीर तालुक्यात १४ लाख टन आणि कागल तालुक्यात ११ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. गेल्या गळीत हंगामात साखर कारखानदारांचा उसाचा अंदाज चुकला होता. अपेक्षित उसाचे उत्पादन न झाल्याने हंगाम लवकर गुंडाळावा लागला. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये उसाच्या वाढीच्या वेळेतच पाऊस सुरू राहिला. नंतर परतीचा पाऊसही जोरदार झाल्याने उसाची वाढ होऊ शकली नाही. परिणामी उद्दिष्टपूर्ती करताना कारखान्यांची दमछाक उडाली होती. यंदासुद्धा पाऊस कसा राहतो, यावरच उसाचे उत्पादन ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here