महाराष्ट्र : ‘माळेगाव’च्या रणांगणात कोण ठरणार वरचढ, निर्णायक लढतीकडे राज्याचे लागले लक्ष

पुणे : दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. अजित पवार, तावरे गुरू- शिष्याची जोडी आणि शरद पवार गटाने या निवडणुकीत प्रचंड ताकद लावली आहे. ‘माळेगाव’च्या रणांगणात कोण वरचढ ठरणार, याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे. काका- पुतण्याच्या या लढतीत तावरे गुरु- शिष्याची जोडीही ताकदीने उतरल्याने लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. तसेच शेतकरी पॅनलकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. आता चार पॅनलकडे फक्त आज (दि.२०) सांयकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करण्यास वेळ आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावून शिवार तापवले आहेत.

अजित पवार यांच्या सत्ताधारी गटाच्या श्री निळकंठेश्वर पॅनलविरोधात सहकार बचाव पॅनल, शरद पवार गटाचे बळीराजा पॅनल तसेच शेतकरी पॅनल, अशी चौरंगी लढत होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून बारामती तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली आहे. एकसंघ राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांत विभागून या निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यात सहकार तज्दा चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांचे पॅनल एकसंघ आहे.

श्री निळकंठेश्वर पॅनलची सांगता सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे जाधवराव कॉम्प्लेक्स, माळेगाव बुद्रुक येथे ५ वाजता होणार असल्याची माहिती बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजवर्धन शिंदे, श्री निळकंठेश्वर पॅनेलचे प्रचार प्रमुख केशवराव जगताप व कृषी उत्पन्न समितीचे माजी चेअरमन सुनील पवार यांनी दिली.सहकार बचाव पॅनलकडून चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी अजित पवार यांच्या पॅनलला लक्ष्य केले आहे. कारखान्यावरील ४०० कोटी रुपये कर्जाचा मुद्दा ते साखर भिजल्याचा आरोप करून सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवार यांच्या सहकार बळीराजा पॅनलकडून सभासदांशी संवाद साधला जात आहे. रविवार (दि. २२) रोजी मतदान आहे. तर मंगळवार (दि. २४) रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here