अहिल्यानगर : डॉ. बाबुराव बापूजी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अरुण बाबुराव तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी फॅक्टरी येथे विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी तालुक्यात पुढील हंगामात पंधरा- सोळा लाख मेट्रिक टन ऊस राहणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला कारखाना येत्या डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा त्यांनी केली. कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची निवड सहा महिन्यांनंतर केली जाईल. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद एस. एम. पाटील होते. प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे, युवा नेते हर्ष तनपुरे, रावसाहेब तनपुरे, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, सुनील अडसुरे अशोक खुरुद, ताराचंद तनपुरे, नवाज देशमुख, प्रकाश देठे, मच्छिंद्र सोनवणे, अप्पासाहेब जाधव, कारखान्याचे व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. तनुपरे म्हणाले की, साखर कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. कारखाना चालू करणे अवघड आहे; परंतु अशक्य नाही. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी केंद्रबिंदू मानून काटकसरीने कारभार करू. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसारखा तनपुरे कारखान्यात स्वच्छ, पारदर्शी व चांगला कारभार करू. कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. मशिनरीची दोष दुरुस्ती, त्रुटी दूर करून कारखाना चालू करण्याचे मोठे आव्हान आहे. दत्तात्रेय कवाणे यांनी सूत्रसंचालन केले. हर्ष तनपुरे यांनी आभार मानले.