सांगली: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्यामध्ये आगामी २०२५-२६च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संचालक पंढरीनाथ घाडगे व त्यांच्या पत्नींच्या हस्ते झाले. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी १३ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती अध्यक्ष कदम यांनी दिली. ऊस तोडणीसाठी कारखान्याने जय्यत तयारी केली आहे. २८३ चारचाकी वाहने, १८० अंगद गाड्या, १६४६ बैलगाड्या व १० हार्वेस्टिंग मशीन सज्ज असल्याचे ते म्हणाले.
मोहनराव कदम म्हणाले, कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांचे आणि सभासदांचे हित जोपासत काम केले आहे. आतापर्यंतचे सर्व हंगाम यशस्वीरित्या पार पाडले असून शेतकऱ्यांना वेळेत आणि एफआरपीनुसार दर दिला आहे. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गळीतास कारखान्यास पाठवावा. यावेळी उपाध्यक्ष सूर्यवंशी, दिलीपराव संचालक रघुनाथराव कदम, बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, जगन्नाथ माळी. शिवाजी गढळे, शिवाजी काळबाग, कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.