लातूर : राज्यात नावलौकिक असलेल्या मांजरा साखर परिवारातील रेणा सहकारी साखर कारखान्याचा चालू गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. कारखान्याची हंगामपूर्व कामे, मशिनरी दुरुस्ती, साफसफाईची कामे पूर्ण करून शुक्रवारी मिल रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याने चालू हंगामात ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्व तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक, सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली. तर देशमुख यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी नरसिंग इंगळे (रा. चिकलठाणा), चंद्रचूड चव्हाण (रा. पानगाव) यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमात तक्रार निवारण समितीचे सदस्यपदी डॉ. उमाकांत देशमुख (रा. डिघोळ दे.) यांची, तर रेणा कारखान्याचे कर्मचारी प्रतिनिधी म्हणून आण्णासाहेब पाटील (रा. सिंधगाव) यांची निवड करण्यात आली. यावेळी कारखान्याच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कारखाना परिसरातील गणेश साई मंदिरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख व उपस्थितांच्या हस्ते पूजन करून मनोभावे दर्शन घेण्यात आले. यावेळी रेणापूर बाजार समितीचे प्रकाश सूर्यवंशी, हरिराम कुलकर्णी, डॉ. बालाजी वाघमारे आदी उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर, संचालक आबासाहेब पाटील, विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळे, जगदीश बावणे, अॅड. प्रमोद जाधव, उमाकांत खलंग्रे, शेषेराव हाके, धनराज देशमुख, तुकाराम कोल्हे आदी उपस्थित होते.