अहिल्यानगर : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे पेमेंट केले आहे. अशोक कारखान्यानेही मागील हंगामाचे थकीत बिल व यंदाचे दुसऱ्या हप्त्याचे पेमेंट करावे, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी केली आहे. अशोक कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे. कारखान्यात अनेक घोटाळे आहेत. ते चव्हाट्यावर येऊ नये यासाठीच कारखान्याचे सर्वेसर्वा असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आठव्यांदा पक्षांतर केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शेडगे म्हणाले की, मुरकुटे हे सत्ताधारी पक्षाचे सहकारी झाले असल्याने त्याचा फायदा साखर कारखान्याचे सभासद व कामगारांना करुन द्यावा. मागील हंगामाचे थकीत असलेले प्रती टन ३०० रुपये व सन २०२४-२५ हंगामाचा दुसरा हप्ता प्रतिटन १५० रुपये याप्रमाणे द्यावा. तसेच कामगारांचे थकीत वेतन, निवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी द्यावी. त्याचप्रमाणे कामगारांची जुलमी २५ टक्के वेतन कपात रद्द करावी. कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत सेवेत घ्यावे. अशोक कारखान्यात घोटाळे करुन तो उधळला गेल्यानेच कारखाना कर्जबाजारी होऊन आर्थिक डबघाईस आला असल्याचा आरोप शेडगे यांनी केला. दरम्यान, कामगार राहत असलेल्या वसाहतीमधील घरे पडझड होऊन मोडकळीस आली आहेत. त्यांचे तत्काळ नूतनीकरण करण्यात आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.