बेळगाव : एस. निजलिंगप्पा साखर संस्थेद्वारे साखर तंत्रज्ञानात पदवी तथा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी खर्चातून महाविद्यालय बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. शनिवारी येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेकडून विविध विभागात उत्तम कार्य केलेल्या साखर कारखान्यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी स्पर्धा करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. या दिशेने राज्यातील साखर कारखान्यांना आवश्यक सहकार्य देण्यात येईल, असे ते म्हणाले.
मंत्री पाटील म्हणाले की, सरकारतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संस्थेद्वारे नव्या पद्धतीची बी बियाणे पुरविण्यासह अन्य प्रकारची मदत करण्यात येत आहे. मात्र, अलीकडे शेतीमध्ये कंत्राटी पद्धत येत आहे. त्यामुळे जमिनीची हानी होत आहे. पुढील दिवसांत जमिनीचा पोत घसरण्याचा धोका आहे. साखर कारखान्यांनी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत राखण्याची जबाबदारी साखर कारखान्यांची आहे. साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा आहे. परंतु, स्वार्थी मनोभाव ठेवून स्पर्धा करू नये. कारखान्यांच्या विकासामध्ये राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना पाणी, वीज, उस बियाणे आदींमध्ये सवलती दिल्या जात आहेत. यावेळी संचालक राजगोपाल, मलगोंडा पाटील, अभिनंदन पाटील, अभय सरनाईक, विजय रवी आदी उपस्थित होते.