पुणे : माळेगाव कारखान्यासाठी चुरशीने मतदान; मंगळवारी मतमोजणी

पुणे : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अत्यंत अटीतटीच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाची कस लागलेल्या या निवडणुकीत सभासद मतदार नेमका कुणाच्या पदरात मत टाकणार?, कारखान्याचा कारभारी कोण होणार, हे मात्र मंगळवारी (२४ जून) होणाऱ्या मतमोजणी दिवशी स्पष्ट होणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व चंद्रराव तावरे यांचे तीन पॅनेल निवडणुकीत आमने-सामने ठाकले आहेत. श्री निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार अजित पवार यांनी सकाळी लवकर शहरातील प्रशासकीय भवन येथे मतदान केले. तसेच श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल माळेगाव केंद्रात खा. सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे रंजन तावरे यांनीदेखील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल कक्ष माळेगाव केंद्रात मतदान केले. तर सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख व चेअरमनपदाचे उमेदवार, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या मोठी होती. या मतदानासाठी ६७ मतदान केंद्रे असून, माळेगाव गट नंबर १ मध्ये ११ मतदान केंद्रे, गट नंबर २ पणदरे १३ मतदान केंद्रे, गट नंबर ३ सांगवी कांबळेश्वर ८ मतदान केंद्रे, गट नंबर ४ खांडज शिरवली ७ मतदान केंद्रे, गट नंबर ५ नीरावागज १२ मतदान केंद्रे, गट नंबर ६ बारामती १५ मतदान केंद्रे होती. ‘ब’ वर्गासाठी १ अशा एकूण ६७मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १९,५४९ मतदारांपैकी १२,२२९ पुरुष व ४,२९४ महिला एकूण १६,५२३ मतदारांनी ८५ टक्के एवढा मतदानाचा हक्क बजावला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला होता.

सतत पाच वर्षे कोण जादा दर देऊ शकतो हे ठरवून माळेगावचा सूज्ञ सभासद स‌द्विवेकबुद्धीला स्मरून योग्य निर्णय घेईल. आमच्यावर कोणीही आरोप केले तरी त्यास उत्तर देण्यासाठी मी रिकामा नाही, असे अजित पवार म्हणाले. तर पारदर्शक कारभार, हमीभाव भाव व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून माळेगावचा कारभार केला पाहिजे. सलग सहा दशके बारामतीकरांच्या आशीर्वादाने शरद पवार हे देशात सहकाराचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे कौल आम्हाला मिळेल, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करून सहकार मोडीत काढण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केला असून, त्यांचे चेअरमनपदाचे स्वप्न कदापि पूर्ण होऊ देणार नाही. या निवडणुकीत २१ पैकी २० जागा आम्ही जिंकू, असा दावा माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here