बीड : गुळ कारखान्याने ऊस बिले थकवल्याने शेतकऱ्यांचे ‘हलगी बजाव’ आंदोलन; कारवाईची मागणी

बीड : रोशनपुरी येथील रुपामाता गुळ कारखान्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत वारंवार मागणी करूनही कारखाना चालकांकडून टाळाटाळ केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) नेतृत्वाखाली २४ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केले. गु्ऱ्हाळ जप्त करून पैसे द्यावेत, अन्यथा कायदा हातात घेऊन गुऱ्हाळ आणि जमिनीचा ताबा घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.

शेकापचे नेते ॲड. नारायण गोले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीच तास आंदोलन करण्यात आले. रुपामाता गुऱ्हाळाची जप्ती करून लिलावाद्वारे विक्री करावी आणि शेतकऱ्यांची ऊस बिले द्यावीत अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. याप्रश्नी आगामी आठ दिवसांत बिले कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी कामगार पक्षाचे मुंजा पांचाळ, श्रीराम शेवाळे, सलीम खान पठाण, विष्णू शेळके, जयराम कोरडे, मुक्तीराम कापसे, भास्कर कांबळे यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here