पुणे : दौंड शुगर कारखाना चालू वर्षी कार्यक्षेत्रातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) प्रणाली राबवणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी केली. खुटबाव (ता. दौंड) येथे तालुक्यात सर्व प्रथम ऊस शेतीसाठी ए.आय. प्रणाली राबविणाऱ्या महेंद्र थोरात यांच्या शेतीमध्ये कारखान्याच्या वतीने बुधवारी (ता. २५) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. जगदाळे म्हणाले, “शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे ए.आय. प्रणाली राबविण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांनी स्वतः भरावेत. दौंड शुगर कारखाना ६७५० रुपये परताव्याच्या अटीवर देणार आहे. उर्वरित ९२५० रुपये महाराष्ट्र शासन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट भरणार आहे. या प्रणालीसाठी ठिबक सिंचन महत्त्वाचे असते. ठिबक सिंचनसाठी एकरी ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १० हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांनी भरावेत. उर्वरित ३५ हजार रुपये कारखाना बिनव्याजी परताव्याच्या अटीवर देणार आहे.
ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे संचालक प्रतापराव पवार यांनी शेतीमध्ये ए.आय. तंत्रज्ञान राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही जगदाळे म्हणाले. महेंद्र थोरात म्हणाले की, ए.आय. प्रणाली राबविल्यामुळे माझी शेती सध्या अभ्यास केंद्र बनली आहे. ११ महिन्यांपूर्वी लागवड केलेला आडसाली उसाला सध्या २७ते २८ कांड्या आलेल्या आहेत. एकरी १२५ टन उसाचे उत्पादन निघेल असा अंदाज आहे. या प्रणालीमुळे वेळ, पैसा, खते, पाणी, श्रम, औषधे यांची हमखास बचत होते. बदलत्या काळानुसार हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने अवगत करणे गरजेचे आहे. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी गायकवाड, ऊस अधिकारी दीपक वाघ, शेतकी अधिकारी संजय काकडे, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, गटप्रमुख विकास थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, प्रशांत थोरात, दीपक होले व शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.