छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याने हंगाम २०२४-२५ मध्ये अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथील चार शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या उसाचा एकही रुपयाही दिलेला नाही. शेतकरी गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून संत एकनाथ साखर कारखाना येथे उसाच्या पैशांसाठी चकरा मारत आहेत. अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही उसाची रक्कम देण्यात आली नाही. उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात ७ दिवसात जमा न केल्यास शेतकरी कारखान्याच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पुण्यात साखर आयुक्तांना निवेदन दिले.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, सचिन घायाळ प्रायव्हेट लिमिटेड संचलित या साखर कारखान्याने अंबड तालुक्यातील सौदंलगांव खुर्द येथील उस बागायतदार शेतकऱ्यांकडून ऊस घेतला. पैसे मात्र दिलेले नाहीत. कारखान्याच्या चेअरमनशीदेखील अनेक वेळेस दुरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु घायाळ यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. संबंधित कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. आगामी ७ दिवसांत शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास शेतकरी आमरण उपोषण करतील, असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बिलवाल, इंदलसिंग राजपूत, अनुसया राजपूत, रामेश्वर राऊत आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. उसाचे बिल न आल्याने नाईलाजाने सावकाराच्या दारात जावे लागत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.