कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील अंतिम ऊस बिले प्रतिटन १३४ रुपये ९७ पैसे प्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. कारखान्याने यंदा प्रति टन ३ हजार ३३४ रुपये ९७ पैसे एवढा उच्चांकी ऊस दर दिल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याने गेल्या हंगामात ४ लाख २१७८८ मॅट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख ३७८७० क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा १२.७५ टक्के एवढा आहे. यापूर्वी एफआरपीपोटी १३४ कोटी ९७ लाख रुपये दिले होते. आता अंतिम बिलापोटी ५ कोटी ६९ लाख रुपये उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. आगामी हंगामात साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रा. पाटील व कवडे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक संजय पाटील, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.