लातूर : पानगाव येथील पन्नगेश्वर कारखाना दोन वर्षांपासून बंद होता. विक्रीस निघालेला कारखाना केजच्या आमदार नमिता मुदंडा आणि अक्षय मुदंडा यांच्या विमल ॲग्रो लिमिटेडने विकत घेतला आहे. कारखान्याचे सर्व शेअर्स नियमित करून घेण्यात यावेत, थकीत ऊस बिलाचे पैसे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्यावे, जुने कर्मचारी नियमित करून घ्यावेत, तोडणी, वाहतूकदारांचे पैसे द्यावेत आदी मागण्यांसाठी ११ जुलै रोजी पानगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून कारखान्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी ही माहिती दिली.
नागरगोजे यांनी सांगितले की, सकाळी अकरा वाजता सभासद शेतकरी, कर्मचारी हा मोर्चा काढणार आहेत. कारखान्याची सभासद संख्या २,५०० असून, डिपॉझिटर शेतकरी ३,६०० आहेत. कर्मचाऱ्यांचे देणे १२ कोटी ५० लाख रुपये आहे. कारखान्याने वाहतूकदारांचे देणे २ कोटी ५० लाख, शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल ३ कोटी रुपये आहे. कारखान्यातील पाचशे कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी अद्याप कामावर घेतलेला नाही. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीचे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे, शहराध्यक्ष श्रीपाल बस्तापुरे, सचिन इगे, इम्रान मनियार आदी उपस्थित होते.