धाराशिव / पुणे : यंदा खरीप हंगामाअखेर शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. प्रकल्पातील मुबलक पाणीसाठा, सिंचन विहिरी, कूपनलिकांमध्येही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने त्याचाही फायदा ऊस लागवडीसाठी झाला. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यंदा राज्यात ११ लाख ५० हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध झाले आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे क्षेत्र सुमारे एक लाख हेक्टरने वाढले आहे. परिणामी यंदा राज्यातील साखर उत्पादनही ३० ते ३५ लाख टनांनी वाढण्याची चिन्हे आहेत.
दोन वर्षांपूर्वी, २०२३ मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे यावर्षी राज्यातील ऊस लागवडीत घट झाल्याने क्षेत्र कमी झाले होते. मागील वर्षी हे ऊस क्षेत्र १० लाख ५० हजार हेक्टर इतके होते. मात्र, २०२४ मध्ये राज्यात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात एक लाख हेक्टरने वाढ झाली आहे. याशिवाय मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने त्याचाही ऊस पिकाला चांगला फायदा झाला आहे. याबाबत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, यंदा राज्यातील ऊस क्षेत्राची स्थिती चांगली आहे. उसाची उपलब्धता वाढलेली आहे. मागील वर्षी राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा हेच साखर उत्पादन ११० ते ११५ लाख टन इतके होईल, अशी अपेक्षा आहे.