सोलापूर : थकित ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘स्वाभिमानी’चे धरणे आंदोलन

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची थकित ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी सध्या पेरणीचा हंगाम सुरू असताना आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. पेरणी करण्यासाठी शेतात मशागत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आरआरसी आदेशाची अंमलबजावणी करून थकित ऊसबिले तत्काळ जमा करावीत, ही संघटनेची मागणी आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, विशालसिंह पाटील, मोहसीन पटेल, इकबाल मुजावर, मकबूल मुबला, शहाजी पवार, नितीन मस्के, नागनाथ सुखले, विजय साठे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना मार्च, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील गोकुळ शुगर, जयहिंद शुगर, मातोश्री शुगर, सिद्धेश्वर सहकारी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, इंद्रेश्वर शुगर या साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here