पाकिस्तानमध्ये साखरेच्या महागाईसाठी साठेबाज, तस्करांना धरले जबाबदार

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साखरेच्या किमतीत झालेल्या वाढीसाठी सट्टेबाजी, मोठ्या प्रमाणात तस्करी आणि संस्थात्मक प्रतिसादाचा अभाव जबाबदार असल्याचे किसान इत्तेहादचे अध्यक्ष खालिद हुसेन बाथ यांनी म्हटले आहे. कराची प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बाथ यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी थेट लक्ष दिल्यास परिस्थिती लवकर स्थिर होऊ शकते, असे सांगितले. त्यांच्या मते, करमुक्त किंवा शुल्कमुक्त आयात न करता साखरेच्या किमती प्रति किलो १२० रुपयांपर्यंत खाली आणता येतील.

बाथ यांनी साखरेच्या सध्याच्या बाजारभावावर टीका केली. त्यांच्या मते साखरेचा दर सुमारे २०० रुपये प्रति किलो आहे, तर उत्पादन खर्च १२० रुपयांपेक्षा जास्त नाही. त्यांनी साखर कारखान्यांच्या कारभाराची संपूर्ण आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. साखर कोणी, किती आणि कोणत्या किमतीला खरेदी केली हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. बाजारातील सट्टेबाजी, तस्करी, आयात पद्धतींमुळे परिस्थिती सुमारे ११४ अब्ज रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात बदलली आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, घाऊक किराणा व्यापारी संघटनेने ५,००,००० टन साखर आयात करण्याच्या सरकारच्या योजनेला तीव्र विरोध केला आहे. संघटनेने साठेबाजी करणारे आणि सट्टेबाज व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तेच कृत्रिमरित्या किमती वाढवत आहेत असा दावा त्यांनी केला. व्यापारी आणि तथाकथित साखर सट्टेबाज माफियांकडे सुमारे २६ लाख टनांचा साठा आहे. हा साठा पुढील पाच महिन्यांची राष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे, असे संघटनेचे अध्यक्ष रौफ इब्राहिम म्हणाले. सरकारने निर्णायक कारवाई केल्यास, घाऊक साखरेचे दर दोन दिवसांत १५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली येऊ शकतात, असा दावा इब्राहिम यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here