कोल्हापूर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ऊस दर चांगला मिळावा यासाठी एफआरपी वाढविली. त्या प्रमाणात साखरेचे दरही वाढवणे आवश्यक आहे. आतापर्यंत साखर उद्योगाला आर्थिक चालना देणारे निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. मका, ज्वारी व इतर धान्यामधून बिगर हंगामात इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी परवानगी देण्याच्या हालचाली सुरू केले आहेत. त्यात साखरेचा हमीभाव प्रतिकिलो दर ४५ रुपये करण्याची गरज आहे असे मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले. कुंभी कासारी कारखान्याचा मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष राहुल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नरके म्हणाले, एफआरपीप्रमाणे साखरेचे दरही वाढवावेत. साखरेचा दर ४५ झाला तरच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील. दरम्यान, कारखान्यात ओव्हर ऑयलिंगचे काम अत्यंत गतीने सुरू आहे. यासाठी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी संचालक अॅड. बाजीराव शेलार, विलास पाटील, संजय पाटील, प्रा. बी. बी. पाटील, अनिष पाटील, सरदार पाटील, अनिल पाटील, राऊ पाटील, उत्तम वरुटे, दादासो लाड, किशोर पाटील, सर्जेराव हुजरे आदी उपस्थित होते.