‘इस्मा’कडूनआगामी हंगाम २०२५-२६ मध्ये ३४९ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज जाहीर

नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने गुरुवारी नवीनतम उपग्रह प्रतिमा आणि ग्राउंड रिपोर्ट्सच्या आधारे पीक आढावा घेतल्यानंतर हंगाम २०२५-२६ मध्ये ३४.९ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा आपला पूर्वीचा अंदाज निश्चित केला आहे. ‘इस्मा’ने प्रथम ३१ जुलै २०२५ रोजी आपला प्राथमिक अंदाज जाहीर केला होता. त्यावेळीही उत्पादन ३४.९ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. जून २०२५ पासूनच्या उपग्रह प्रतिमा वापरून हा अंदाज व्यक्त केला होता. त्याला क्षेत्र-स्तरीय मूल्यांकनांचा आधार होता आणि मान्सूनची सामान्य परिस्थिती गृहीत धरली गेली होती.

आता सप्टेंबरच्या सुरुवातीला ‘इस्मा’ने महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठीच्या अतिरिक्त उपग्रह डेटाचा वापर करून आपल्या अनुमानाचे पुनर्मूल्यांकन केले आहे. यामध्ये नैऋत्य मान्सूनची प्रगती, जलाशयांची पातळी आणि प्रमुख उत्पादक राज्यांमधील सध्याच्या पीक स्थितीचे अपडेट्स यांचा समावेश आहे. ‘इस्मा’च्या मते, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनुकूल मान्सून परिस्थिती आणि ऑगस्टमध्ये झालेला मुबलक पाऊस यामुळे पीकांची निरोगी वाढ आणि सामान्य विकास झाला आहे. जलाशयांची पातळी गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहिल्याने आणि नैऋत्य तसेच आगामी ईशान्य मान्सूनमध्ये सातत्यपूर्ण पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याने, या प्रमुख साखर उत्पादक राज्यांसाठी ऊस उत्पादन स्थिती मजबूत आहे.

उत्तर प्रदेशात, गेल्या वर्षीपेक्षा पीक स्थिती खूपच चांगली असल्याचे वृत्त आहे. ऊस विकासासाठी उद्योग स्तरावरील पुढाकार आणि सुधारित वाणांचा वेळेवर प्रसार झाल्यामुळे निरोगी पिकांना हातभार लागला आहे. रोगांचे प्रमाण कमी झाल्यामुळे चांगले उत्पादन आणि उच्च साखर उतारादेखील अपेक्षित आहेत, असे इस्माने म्हटले आहे. तामिळनाडूनेदेखील आशादायक ट्रेंड दाखवले आहेत. जिथे उत्पादन आणि साखर पुनर्प्राप्ती दोन्ही पूर्वीच्या अंदाजांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.

तथापि, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड सारख्या काही उत्तरेकडील राज्यांना स्थानिक पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात किरकोळ घट होणार आहे. या अडचणी असूनही, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील पिकाची एकूण गुणवत्तेमुळे ही कमतरता भरून निघेल. त्यामुळे राष्ट्रीय उत्पादन अंदाज स्थिर राहील, असे इस्माने म्हटले आहे.

इस्माने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये उसाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे उत्पादनात किरकोळ वाढ होत आहे. परंतु पूरग्रस्त भागात झालेल्या किंचित घटीमुळे हे प्रमाण कमी होईल. परिणामी, २०२५-२६ चा राष्ट्रीय साखर उत्पादन अंदाज ३४९ लाख टनांवर स्थिर राहिला आहे.” इस्माने पुढे जाहीर केले की, ते ऑक्टोबर २०२५ मध्ये पीक परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करतील. पाऊस, पाण्याची उपलब्धता आणि ऊस तोडणीच्या ट्रेंडमधील नव्या घडामोडी लक्षात घेऊन ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here