कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कामगारांच्या नियमांमुळे साखर कामगार अस्वस्थ असले तरी साखर कारखाने आपले दैवत आहेत याची जाणीव ठेवून काम करावे, असे प्रतिपादन दत्त शेतकरी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, केंद्र शासनाचे कामगारांच्या नियमांतून कामगारांचे शोषण होत आहे. तसेच, दिवसेंदिवस कामगार संघटनांचा दबदबा कमी होऊ लागला आहे, असे असले तरी वेळोवेळी कामगार प्रतिनिधी मंडळ कामगारांच्या हितासाठी धडपडत आहेत. त्यातून योग्य निर्णय लवकरच होऊन कामगारांना चांगले दिवस येतील. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंतराव पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील व कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात अॅड. गणेश शिंदे यांनी बदललेले कामगार कायदे आणि त्यावर कामगारांनी कोणती दक्षता घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. विठ्ठल कोतेकर यांनी समृद्धीच्या मानसिकतेतून सर्वांगीण विकास यावर मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव योगेश हंबीर, संजय मोरबाळे, एम. एम. पाटील, विलास शिंदे आदी उपस्थित होते.