महाराष्ट्र : साखरेचा दर स्थिर राहिल्याने उसाला प्रतिटन ३४०० रुपये पहिली उचल शक्य

कोल्हापूर : यंदा केंद्र सरकारने उसाच्या १०.२५ टक्के उताऱ्याला ३,५५० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. त्यापुढे प्रत्येक टक्क्याला ३५५ रुपये मिळणार आहेत. गेले वर्षभर साखरेचा घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल ३९०० रुपयांवर स्थिर राहिला आहे. घाऊक बाजारातील दर स्थिर राहिल्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल प्रतिटन ३,३०० ते ३,४०० रुपये मिळू शकेल. साखर कारखान्यांकडून उर्वरित रक्कम अंतिम हिशेबानंतर दिली जाईल अशी शक्यता आहे. जय शिवराय शेतकरी संघटनेने साडेतीन हजार रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिली उचल किती मागते याचा निर्णय १६ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत होईल.

गेल्या वर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे. एक टन ऊस गाळपातून किमान १२० किलो साखर उत्पादन गृहीत धरले तर साखरेतून ४,६८० रुपये मिळू शकतात. उपपदार्थ उत्पादनातून प्रतिटन किमान ७०० रुपये उत्पन्न मिळू शकते. एकूण ५,३८० रुपयांमधून सरासरी प्रतिटन ८५० रुपये ऊस तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता कारखान्यांच्या हातात ४,५३० रुपये राहतात. त्यातून साखर उत्पादन खर्च प्रतिटन ११०० रुपये गृहीत धरला तरी ३,४३० रुपये शिल्लक राहू शकतात. त्यामुळे यंदा हा दर मिळू शकेल असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here