पुणे : राजगड सहकारी साखर कारखान्याने यंदा, सन २०२५-२६ साठी ऊस लागवड विकास कार्यक्रमाला गती दिली आहे. भोर तालुक्यातील तीसगाव खोऱ्यातील मौजे खानापूर येथील शेतकरी जितेंद्र भरत पोळ व शिवाजी रामभाऊ थोपटे या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर को ८६. ०३२ या जातीचे उसाचे निकोप बियाणे उपलब्ध करून देऊन ऊस लागवड शुभारंभ करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर उसाची रोपे लागवडीसाठी दिली आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. आता खतेही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी यावेळी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऊस लागवडीचा शुभारंभ केला. कारखान्याचा पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरीत्या सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात अधिकाधिक ऊस लागवड व्हावी यासाठी शेतकऱ्यांना उसाचे बियाणे शेताच्या बांधावर उपलब्ध करून देत आहे, असे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव सुके, संचालक उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, अनिल सावले, अतुल किंद्रे, संदीप नांगरे, मधुकर कानडे, राजेंद्र शेटे, पोपट मालुसरे आदींसह या भागातील विविध गावांतील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.











