सांगली : महाराष्ट्र सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. पण, सीमाभागातील कारखान्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी या आठवड्यातच ऊस गाळप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. ते कारखाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात. त्यामुळे उसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे.
कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवारपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. मात्र, ऊस दर जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या ऊस दराबाबत शेतकरी संघटनांनी कडक भूमिका घेतली आहे. आधी ३७५१ रुपये जर जाहीर करा, मगच गाळप सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी ३८०० रुपये क्विंटलने झालेली आहे. इथेनॉल, बायोगॅस, मळी, अल्कोहोल यांसह इतर उपपदार्थानाही चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.












