सातारा : कापशी (ता. फलटण) येथील शरयु अग्रो इंडस्ट्रिजच्या ११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या हस्ते पार पडला. ‘शरयु’ने परिसरात उच्चतम ऊस दर देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा कायम प्रयत्न केला आहे, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. शरयु कारखान्याने गेल्यावर्षी गळीत झालेल्या ऊसाचे बिल विनाकपात एकरकमी शेतकऱ्यांना अदा केले असून सवलतीच्या दरात प्रतीटन एक किलोप्रमाणे दिवाळीपूर्वीच साखर वाटप केली आहे.
ते म्हणाले, संपूर्ण कार्यक्षेत्रात सक्षम तोडणी यंत्रणा हजर झाली असून १ नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने गाळपास गती येणार आहे. फलटण, खंडाळा, वाई, जावळी,सातारा, कोरेगाव, माण, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर तालुक्यांतून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस नोंदी केल्या असून शेती विभागाकडून ऊस तोडीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
शेतकाऱ्यांनी संपूर्ण ऊस शरयु कारखान्याला घालावा, असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले. या गळीत हंगामात सुमारे १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आसवनी प्रकल्प तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संचालक अविनाश भापकर, युनिट हेड विजय जगदाळे, दऱ्याचीवाडी येथील विक्रमी ऊस उत्पादक ज्ञानदेव कदम, वरिष्ठ विभाग प्रमुख, उपप्रमुख, कर्मचारी, शेतकरी, वाहतूक ठेकेदार, वाहन मालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


