सातारा : जिल्ह्यातील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज (कापशी-फलटण), दत्त इंडिया साखरवाडी (फलटण), किसनवीर कारखाना (भुईंज, ता. वाई), खंडाळा कारखाना (खंडाळा), प्रतापगड (अजिंक्य सहकारी) साखर कारखाना (कुडाळ, ता. जावली) व स्वराज ग्रीन पॉवर लि. (उपळे, ता. फलटण) या साखर कारखांनी अद्याप ऊस दर जाहिर केलेले नाहीत. या कारखान्यांनी लवकर ऊस दर जाहीर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. ऊस दराबाबत सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकरी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ऊसतोड कामगार ऊस तोडीचे अतिरिक्त पैसे मागत असल्यास कारखान्यांकडे तक्रारी करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी सभेत केली.
या सभेत अथणी शुगर्स, शिवनेरी शुगर्स, अजिंक्यतारा कारखाना, जरंडेश्वर यांनी ३,५०० रुपये, कल्लापाण्णा आवाडे (श्रीराम सहकारी) फलटण यांनी ३,०१० रुपये, खटाव-माण ॲग्रोने ३,३०० रुपये असे दर या सभेत जाहीर केले. तर कृष्णा कारखाना, जयवंत शुगर्स, सह्याद्री कारखाना यांनी ३,५०० रुपये तर ग्रीन पॉवर-गोपुजने ३,३०० रुपये आणि लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने ३,००० रुपये दर निश्चित केले होते. हेच दर अंतिम करण्यात येणार असल्याचे या कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सभेत सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हा निबंधक संजय सुद्रिक, प्रादेशिक उपसंचालक (साखर) प्रशांत सूर्यवंशी, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) अजय देशमुख, सदाशिव गोसावी आदी उपस्थित होते.


















