सातारा : सध्या कराड तालुक्यात ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. ऊस तोडायचा असेल तर एकरी चार हजार रुपये, अडचणीतील ऊस असेल व रस्ता नसेल तर पाच हजार रुपये असा दर काढला आहे. हे पैसे दिले तरच मजूर उसाला कोयता लावत आहेत. शेतकरी उसनवारी करून पैसे देत आहे. ऊस तोडणी, वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या बोकांडी बसत असून आता मजुरांची वसुलीही शेतकऱ्यांच्या सोसावी लागत आहे. याशिवाय मजुरांना सकाळचा चहा, शेतातून ऊसाने भरलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर, रस्ता करण्यासाठी मजुराची मजुरी हा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ऊसाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचा मेळ बसत नसताना ऊस तोडण्यासाठी एकरी ४००० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या १५ वर्षांत ऊसतोड मजुरांच्या दरात दोनशे रुपयांवरून सहाशे रुपयांपर्यंत म्हणजे तब्बल तीनपट वाढ झाली आहे; परंतु त्याच काळात ऊसाच्या दरात दुप्पट वाढही झालेली नाही. यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांनी पैसे दिले तरच उसाला कोयता असा फंडा ऊसतोड मजुरांनी अवलंबिला आहे. याकडे कारखाने व यंत्रणांकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. साखर कारखाने ऊस तोडणीसाठी मुकादमांमार्फत कामगारांशी करार करतात. या करारात मजुरांची ये-जा राहण्याची सोय आणि तोडणीचा दर स्पष्ट नमूद केलेला असतो. तरीही प्रत्यक्षात मजुरांकडून करारापलिकडे भरमसाठ मागण्या केल्या जात आहेत. सुरुवातीला एकरी चार ते पाच हजार, तर हंगामाच्या शेवटी पाच ते दहा हजार रुपये अतिरिक्त स्वरूपात शेतकऱ्यांकडून उकळले जात असल्याचा शेतकऱ्यांना वाईट अनुभव आहे, असे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.


















