सातारा : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्सने २०२५-२६ च्या हंगामात पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण ३५ कोटी १६ लाखांचे बिल शेतकऱ्यांच्या केले. जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम ऊसदराची कोंडी फोडत प्रतिटन ३५०० रुपयांचा दर जाहीर करत ऊसदरात आघाडी घेतली. आता जयवंत शुगर्सने ऊस बिल वाटपातही आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात साखर कारखानादारीत अनोखा आदर्श घालून दिला आहे.
कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या उसापोटी प्रतिटन ३५०० प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ३५ कोटी १६ लाख रुपये जमा केले. जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी केंद्रित धोरणे घेत आणि व्यवस्थापनातील सातत्य ठेवत ऊस उत्पादकांत विश्वास निर्माण केला. कारखान्याचे संस्थापक डॉ. भोसले यांनी ऊस उत्पादकांना चांगला दर देत, वेळेत ऊसबिल जमा करण्याची परंपरा जपली आहे.


















