कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे (व्हीएसआय) यांच्या वतीने दिला जाणारा कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार श्री दत्त कारखान्यास जाहीर झाला. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख एक लाख रुपये असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी दिली. पुरस्कार वितरण सोमवारी (ता. २९) होणाऱ्या व्हीएसआयच्या वार्षिक साधारण सभेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
श्री दत्त कारखान्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक व अद्ययावत यंत्रणा, पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्याचा वापर व त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी बचत, सांडपाणीशून्य उत्सर्जनाची योग्य अंमलबजावणी, वृक्षलागवड, माती संवर्धनासाठी प्रयत्न, कारखाना कार्यक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर जोपासलेला हरित पट्टा, परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी केलेली विविध कामे व पर्यावरण व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ आदींची दखल घेऊन ‘व्हिएसआय’च्या वतीने कारखान्यास हा पुरस्कार जाहीर केला आहे.

















